- सांगा साहेब , श्रीक्षेत्र देहू – देहूरोड पालखी मार्गावरुन वारकऱ्यांनी चालायचं कसं ? भाविकांनी पालखीचं दर्शन घ्यायचं कसं? बैठका होऊनही विसावा स्थळासह पालखी मार्गवरील समस्या दूर करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
देहूरोड : गेल्या महिनाभरात शासन स्तरावर मुंबईतील मंत्रालयासह पुण्यात व देहूत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या सोयी-सुविधा नियोजनासाठी तसेच समस्या दूर करण्यासंदर्भात बैठका होऊनही देहू -देहूरोड पालखी मार्गावर व चिंचोलीतील पालखी विसावा स्थळावरील विविध समस्या दूर करण्याबाबत संबंधित यंत्रणेकडून ठोस निर्णय व उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने सांगा साहेब , श्रीक्षेत्र देहू – देहूरोड पालखी मार्गावरुन वारकऱ्यांनी चालयचं कसं ? पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीचं दर्शन घ्यायचं कसं ? असा सवाल उपस्थित केला जात आहे .
गेल्या माहिन्यात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी , तहसीलदार आदि संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व विभागांच्या बैठका घेतल्या . बैठकांत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संबंधितांना सूचना देण्यात आल्या होत्या . देहू -देहूरोड परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनीही लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी , तहसीलदार , कॅन्टोन्मेंट बोर्डाला वारंवार निवेदने दिली असतानाही प्रशासनाच्या ढिम्म धोरणामुळे चिंचोलीतील पालखी विसावा स्थळासह पालखी मार्गावरील समस्या आजतागायत जैसे थे असून वारकऱ्यांची व भाविकांची मोठी गैरसोय होणार असून लहान- मोठे अपघात झाल्यास जबाबदार कोण ? चिंचोलीतील ग्रामस्थांनी प्रशासनाला पुन्हा सह्यांचे निवेदन देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे .
पालखी चिंचोलीतील विसावा स्थळी आल्यानंतर सोहळ्यातील दिंड्यांतील वारकरी भाविकांना दुपारचे भोजन तयार करणे, वारकऱ्यांच्या पंगती बसविण्यासाठी तसेच विसाव्यासाठी गेली अनेक वर्षे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे . गेल्या वर्षी पावसामुळे विसावा स्थळी विविध समस्यांना सामोरे जावे लागले होते .यंदाही पावसाला सुरुवात झाली असून पालखी तळावरील समस्यांबाबत तसेच पालखी मार्गाच्या दुरवस्थेबाबत श्रीक्षेत्र देहू – देहुरोड पंचक्रोशीतील ग्रामस्थ कृती समितीने कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव यांची भेट घेऊन समस्या दूर करणेबाबत चर्चा करून मागण्यांचे लेखी निवेदन दिले होते .
संत तुकोबांचा पालखी सोहळा दि . ७ जुलैला प्रस्थान ठेवणार असून वारकरी व भाविक येत्या दोन – तीन दिवसांत देहू पंचक्रोशीत दाखल होण्यास सुरुवात होणार आहे . मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून वारकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी झाडे- झुडपे व साफसफाई व्यतिरिक्त ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाले असून सोहळ्यातील लाखो वारकरी , भाविक व पंचक्रोशीतील विविध गावांतून दर्शनाला येणाऱ्या स्थानिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे .
प्रमुख समस्या जैसे थे :
चिंचोली येथील विसावा स्थळाची परिसरातील मैदानात असलेले सर्व खड्डे डबर , दगडी , खडी , माती -मुरूम टाकून तातडीने भरुन दुरुस्ती करून घेणे आवश्यक होते मात्र झालेले नाही. परिणामी वारकरी व भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे .
श्री क्षेत्र देहू -देहूरोड दरम्यान अत्यंत अरूंद पालखी मार्गालगत चिंचोली गावाच्या परिसरात मोठे चर खोदण्यात आले असून आषाढी वारीतील वारकरी , भाविक व दर्शनाला येणारे स्थानिक ग्रामस्थ चरात पडून अपघात होण्याची शक्यता आहे . पालखी मार्गावर विविध ठिकाणी लहान -मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या बाजू पट्टयांवर विविध ठिकाणी दगडांच्या आडव्या रांगा लावल्याने वारकऱ्यांना व भाविकांना चालताना ठेच लागण्याची शक्यता आहे .
सीओडी डेपो ते देहूरोड येथील संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार दरम्यान विविध ठिकाणी असलेले लहान -मोठे खड्डे दुरुस्त करण्यात आलेले नाहीत . रस्त्यालगत चिंचोलीसह विविध भागात पाणी साचले असून चिखल झालेला आहे . साईड पट्टयांची दुरवस्था झाली आहे .
मुख्य पालखी रस्ता व साईडपट्टयामध्ये मोठे अंतर पडले असून दुचाकी वाहने व मोटारींचे वारंवार अपघात होत असून आषाढी वारीतील रथासह वारकऱ्यांनाही चालताना अपघात होण्याची शक्यता असून वारकऱ्यांना अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे .