- सांगा साहेब , श्रीक्षेत्र देहू – देहूरोड पालखी मार्गावरुन वारकऱ्यांनी चालायचं कसं ? भाविकांनी पालखीचं दर्शन घ्यायचं कसं? बैठका होऊनही विसावा स्थळासह पालखी मार्गवरील समस्या दूर करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
देहूरोड : गेल्या महिनाभरात शासन स्तरावर मुंबईतील मंत्रालयासह पुण्यात व देहूत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या सोयी-सुविधा नियोजनासाठी तसेच समस्या दूर करण्यासंदर्भात बैठका होऊनही देहू -देहूरोड पालखी मार्गावर व चिंचोलीतील पालखी विसावा स्थळावरील विविध समस्या दूर करण्याबाबत संबंधित यंत्रणेकडून ठोस निर्णय व उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने सांगा साहेब , श्रीक्षेत्र देहू – देहूरोड पालखी मार्गावरुन वारकऱ्यांनी चालयचं कसं ? पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीचं दर्शन घ्यायचं कसं ? असा सवाल उपस्थित केला जात आहे .
गेल्या माहिन्यात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी , तहसीलदार आदि संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व विभागांच्या बैठका घेतल्या . बैठकांत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संबंधितांना सूचना देण्यात आल्या होत्या . देहू -देहूरोड परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनीही लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी , तहसीलदार , कॅन्टोन्मेंट बोर्डाला वारंवार निवेदने दिली असतानाही प्रशासनाच्या ढिम्म धोरणामुळे चिंचोलीतील पालखी विसावा स्थळासह पालखी मार्गावरील समस्या आजतागायत जैसे थे असून वारकऱ्यांची व भाविकांची मोठी गैरसोय होणार असून लहान- मोठे अपघात झाल्यास जबाबदार कोण ? चिंचोलीतील ग्रामस्थांनी प्रशासनाला पुन्हा सह्यांचे निवेदन देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे .
पालखी चिंचोलीतील विसावा स्थळी आल्यानंतर सोहळ्यातील दिंड्यांतील वारकरी भाविकांना दुपारचे भोजन तयार करणे, वारकऱ्यांच्या पंगती बसविण्यासाठी तसेच विसाव्यासाठी गेली अनेक वर्षे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे . गेल्या वर्षी पावसामुळे विसावा स्थळी विविध समस्यांना सामोरे जावे लागले होते .यंदाही पावसाला सुरुवात झाली असून पालखी तळावरील समस्यांबाबत तसेच पालखी मार्गाच्या दुरवस्थेबाबत श्रीक्षेत्र देहू – देहुरोड पंचक्रोशीतील ग्रामस्थ कृती समितीने कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव यांची भेट घेऊन समस्या दूर करणेबाबत चर्चा करून मागण्यांचे लेखी निवेदन दिले होते .



























