आषाढी पायी वारी : चिंचोलीत ग्रामस्थांकडून वारकऱ्यांना अन्नदानासह विविध सोयीसुविधा ; चिंचोली ग्रामस्थांकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा
देहूरोड : श्रीक्षेत्र देहूतून संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या राज्यातील विविध दिंड्या पालखी प्रस्थानच्या आदल्या दिवशी देहूत आल्यानंतर पूर्वीप्रमाणे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने चिंचोलीत मुक्कामासाठी आल्या होत्या . दिंड्याविरहित मोकळे चालणारे अनेक वारकरी चिंचोली गावात दरवर्षीप्रमाणे मुक्कामाला आल्यानंतर ग्रामस्थ व गावातील अनेक दानशूर कुटुंबे दोन-तीन दिवस अन्नदान मुक्कामासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या . वारकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून मनोभावे सेवा करीत असल्याचे चित्र दिसून आले .
तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी व पालखी प्रस्थानचे दिवशी दिंडया व वारकरी चिंचोलीत आल्यानंतर सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर , गणेश मंदिर , हनुमान मंदिर , विठ्ठल रखुमाई -मारुती मंदिर चौक तसेच गुरुदेवदत्त मंदिर येथे चहापाणी व रात्रीच्या भोजनाची व निवासाची सोय केली होती . दुसऱ्या दिवशी सकाळी वारकऱ्यांच्या आंघोळीसह गावातील काही कुटुंबे नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करीत असतात . गावातील काही व्यक्ती , विविध सार्वजनिक मंडळे , चिंचोली ज्येष्ठ नागरिक संघाकडूनही वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्यात आली. ग्रामस्थांकडून वारकऱ्यांना लागणार्या दैनंदिन वस्तूंचे वाटपही करण्यात आले. याबाबत सर्वांची लगबग दिसत होती .
गावातील काही संस्था , कुटुंबे व व्यक्ती मात्र कोणतीही प्रसिद्धी न करता वारकऱ्यांची सेवा करताना दिसून येतात . अन्नदानासाठी ग्रामस्थांसह हनुमान व्यायाम मंडळ, श्री शनेश्वर देवस्थान कमेटी , भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट , गुरुदत्त देवस्थान समिती , साईनाथ मित्र मंडळ , आदर्श मित्र मंडळ आदि मंडळाचे पदाधिकारी व सभासद पुढाकार घेतला . . आषाढी वारी परत आल्यानंतर एकादशीलाही काही ग्रामस्थ फराळ वाटप करीत असतात .


























