किवळेत वाहनचालकांना घालावा लागतोय १ ते ३ किमीचा वळसा: वाहन चालकांची दमछाक अन् इंधनासह वेळ व पैशाचा होतोय अपव्यय ;
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपाययोजना कधी होणार ?
किवळे: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाच्या किवळे येथील बापदेव महाराज पुल व मुकाई चौक परिसरातून रावेत , किवळे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना १ ते ३ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे . परिणामी वाहनचालकांची दमछाक होत असून इंधनासह वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असल्याने त्रस्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानुसार संबंधित यंत्रणांनी इंधन वाचविण्यासाठी आता तरी वाहनांचा वळसा थांबविण्याची कार्यवाही करण्याची मागणी जागरुक नागरिकांतून होऊ लागली आहे .
मुकाई चौकातून थेट जाण्यास बंदी मात्र दररोज होतेय वाहतुक कोंडी :
किवळेतील मुकाई चौक व बापदेव महाराज पूल
( सबवे ) परिसरात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी देहूरोड व विकासनगरकडून येणाऱ्या सर्व वाहनांना २० महिन्यांपूर्वी ( सप्टेंबर २०२४ ) मुकाई चौकातून बीआरटी मार्गे थेट रावेतकडे व मुकाई चौकातून उजवीकडे वळून सबवेमार्गे किवळेकडे जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे . परिणामी देहूरोडकडून येणाऱ्या सर्व वाहनांना रावेत व किवळेत जाण्यासाठी मुकाई चौकात आल्यानंतर माळवालेनगरकडे डावीकडे वळून एक किलोमीटरचा वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागत आहे . निगडी- मुकाई चौक बीआरटी
मार्गावर वाहतुक वाढली असून मुकाई चौक बस टर्मिनसपासून माळवालेनगरपर्यंत दररोज वाहतुक कोंडी होत असल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्याने इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे .

मुंबईसह किवळे , गहुंजेकडे जाणाऱ्यांना आता ३ किमीचा वळसा :
मुकाई चौकाातून सबवे मार्गे द्रुतगती मार्गाने मुंबई, कात्रज देहूरोड बाह्यवळणमार्गे तळेगाव तसेच किवळे व गहुंजेकडे जाणाऱ्या पीएमपी व इतर प्रवासी बस , हलकी व अवजड वाहनांना सबवेजवळ २. ५ मीटर उंचीचे लोखंडी अडथळे लावून (मंगळवार दि २५ मार्च ) बंदी घालण्यात आली आहे . परिणामी या वाहनांना किवळेतील पूलाच्या सेवा रस्त्याने रावेत पूलाकडून वळसा घेऊन पुन्हा मुंबई, तळेगाव , किवळे व गहूंजेकडे जावे लागत आहे . निगडीहून किवळे सिम्बायोसीस विद्यापीठ व गहुंजेकडे जाणाऱ्या पीएमपी बसलाही रावेत पुलापर्यंत ३ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे . परिणामी इंधनासह वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असून स्थानिक ग्रामस्थ , वाहनचालक, विद्यार्थी , कामगार व प्रवासी त्रस्त झाले आहेत .
द्रुतगतीने शहरात येणाऱ्या वाहनांनाही घालावा लागतोय मोठा वळसा :
मुंबईहून द्रुतगतीमार्गे येणाऱ्या वाहनांना रावेत व किवळेत जाण्यासाठी १ ते ३ किमीचा वळसा घालावा लागत आहे .
रावेत व निगडीकडून बीआरटीमार्गे येणाऱ्या वाहनांना देहूरोड व किवळेकडे जाण्यास मोठा वळसा घालावा लागत आहे .
वडगाव मावळ ते कात्रज बसला १ किमीचा वळसा घालून जावे लागत आहे .
शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या बसलाही १ते ३ किमीचा वळसा घालावा लागत आहे .

























