आषाढी पायी वारी २०२६ : देहूरोड ते निगडी दरम्यान महामार्ग वारकऱ्यांसाठी बनलाय धोकादायक ; वारकऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांचे खासदार श्रीरंग बारणे यांना साकडे ; बारणेंनी अधिकाऱ्यांना समस्या दूर करणेबाबत दिल्या स्पष्ट सूचना
देहूरोड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या सहभागाने जुलै महिन्यात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून देहूरोड ते निगडी दरम्यान मार्गस्थ होणार आहे . मात्र देहूरोड ते निगडीपर्यंतचा महामार्गावरील प्रवास वारकऱ्यांना बिकट व असुरक्षितच राहिला आहे . प्रशासनाला कळवूनही रस्ते विकास महामंडळासह संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या दुतर्फा असलेले लोखंडी सुरक्षा कठडे बसविण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे . प्रशासन दरवर्षी वारकरी – भाविकांच्या जीवाशी खेळत असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले असून संबंधितांना सूचना देऊन वारकऱ्यांची गैरसोय दूर करणेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन साकडे घातले . बारणे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांसमोरच संबंधित कामे तातडीने सुरु करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या .
देहूरोड ते निगडी दरम्यान पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने या मार्गाचा ताबा असणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महामार्गावरील विविध समस्या पालखी प्रस्थानापूर्वी दूर करून वारकऱ्यांची गैरसोय थांबवून अपघात विरहित वारी होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी स्थानिकांनी रस्ते विकास महामंडळाकडे व तहसीलदारांकडे गेल्या महिन्यात २५ मेला निवेदनाद्वारे केली होती . मात्र शुक्रवारी (दि. ५ जून) प्रत्यक्ष पाहणी केली असता देहूरोड ते निगडी दरम्यान रस्ता बांधल्यानंतर बसविलेले लोखंडी रेलिंगची दुरवस्था झालेली आहे . तुटलेले रेलींग काढल्याने व पुन्हा दुरुस्ती न केल्याने गर्दीतील वारकरी व भाविक वाटचालीत रस्त्यालगतच्या उंच कठड्यावरून थेट खोलगट भागात जमिनीवर पडून अपघात होण्याची शक्यता आहे . पालखी सोहळ्यातील वाहने तसेच पायी चालणाऱ्या भजनात तल्लीन होऊन चालणाऱ्या वापरकर्त्यांना व पालखीसोबत निगडीपर्यंतपायी जाणाऱ्या पंचक्रोशील भाविकांना अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे .
देहूरोड ते निगडी दरम्यान महामार्ग लगत काही ठिकाणी काटेरी झाडाझुडपांच्या फांद्या, माती ,खडी व गवत मार्गावर आले असल्याने पालखी सोहळ्यातील भजनात तल्लीन होऊन चालणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय शक्यता आहे .
महामार्गाच्या झाडांच्या बाजूला तुटलेल्या संरक्षक लोखंडी जाळ्यांसह कठडे निघून दुरवस्था झालेली आहे. महामार्गावरील पांढरे पट्टे पुसट झालेले आहेत . रस्त्याच्या पांढऱ्या पट्टयांवर तसेच दुभाजक व डाव्या बाजूला पांढरे, लाल व पिवळे आय कॅट रिफ्लेक्टर लावलेले नाहीत . महामार्गावरील बहुतांशी पथदिवे बंद असून संत तुकाराम महाराज प्रवेशद्वारासमोर विरस्थळ चौकातील (महामार्गावर ) चौकातील चालू बंद होणारे दिवे व पथदिव्यांचा खांब अपघातानंतर बसविण्यात आलेला नाही . अशा विविध समस्यांमुळे देहूरोड ते निगडी रस्तावर येणाऱ्या भाविकांसह वारकऱ्यांसाठी असुरक्षित बनला असल्याने तातडीने संबंधितांकडून कार्यवाही करणेबाबतचे निवेदन खासदार श्रीरंग बारणे यांना शनिवारी देण्यात आले .
याबाबत बारणे यांनी तातडीने रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांच्याशी संपर्क साधत देहूरोड ते निगडी दरम्यानची सर्व संबंधित कामे तातडीने सुरू करून गैरसोयी दूर करण्याचे निर्देश दिले . यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंटचे सदस्य ॲड कैलास पानसरे , शिवसेनेचे युवा नेते सुनिल हगवणे , राजेंद्र तरस , कामगार नेते तुकाराम जाधव , देवराम भेगडे , बाळसाहेब जाधव , नंदकुमार काळोखे , बबन पिंजण , प्रथमेश जाधव यांच्यासह देहू , चिंचोली , किन्हई व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते .