रावेतमध्ये गतिरोधक उभारले मात्र निकष पाळण्याकडे मनपाचे दुर्लक्ष , दुचाकी आदळून होताहेत अपघात
किवळे : रावेतमध्ये गेल्या आठवड्यात अपघात झाल्यानंतर प्रभागातील नगरसेवकांच्या पुढाकाराने तातडीने गतिरोधक उभारण्यात आले आहेत . मात्र गतिरोधक उभारताना इंडियन रोड काँग्रेसचे निकष पाळण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत असून रात्रीचेवेळी गतिरोधक दिसत नसल्याने हलकी वाहने व दुचाकी आदळून अपघात होऊ लागले आहेत . मनपाने तातडीने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
रस्त्यांवर गतिरोधक बांधण्या करीता इंडियन रोड काँग्रेसचे निकष पाळून गतिरोधक बांधावे लागतात . वाहतूक पोलिसांनी शिफारस केलेल्या ठिकाणी तसेच शाळा, दवाखाने , बालवाडी , अंगणवाडी आदी महत्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या परवानगीने गतिरोधक बांधण्याची पद्धत आहे . तसेच गतिरोधक बांधताना गतिरोधकाची रुंदी 3.7 मीटर ठेवावी , उंची 10 सेंमी , गतिरोधकाांचा दोन्ही बाजूंचा उतार 1.20 मीटर ठेवावा , दोन गतिरोधकांतील अंतर 100 ते 120 मीटर ठेवावे, गतिरोधकाच्या अगोदर 40 मीटर अंतरावर ‘पुढे गतिरोधक आहे ” असा मार्गदर्शक फलक लावण्यात यावा , गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत , तसेच रात्रीचेवेळी गतिरोधक दिसण्यासाठी परावर्तक ( कॅट आय ) बसवावेत असे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत .
मात्र महापालिकेने अपघातानंतर गतिरोधक उभारले असून पुढे गतिरोधक असल्याचे मार्गदर्शक फलक लावलेले नाहीत . गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नाहीत . रात्रीचेवेळी गतिरोधक दिसण्यासाठी परावर्तक लावले नाहीत . परिणामी अपघात रोखण्याऐवजी गतिरोधक न दिसल्याने वाहने आदळून अपघात होत असून मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे .
धोकादायक ठिकाणी गतिरोधक उभारा – रेश्मा कातळे
प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध धोकादायक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघात होत असून संबंधित ठिकाणी मनपाने गतिरोधक उभारावेत , असे नगरसेविका नगरसेविका रेश्मा बापू कातळे यांनी सूचित केले आहे .

✍🏻संपादक – देवराम भेगडे

























